बेळगाव : रायबाग तालुक्यातील भिरडी गावातील एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वे खाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बुधवार (ता. 27) रात्री रायबाग येथे ही घटना घडली आहे. सातप्पा अण्णाप्पा सुतार (वय 60), महादेवी सातप्पा सुतार (50), संतोष सातप्पा सुतार (26), दत्तात्रय सातप्पा सुतार (वय 28, सर्वजण रा. भिरडी ता. रायबाग) अशी त्यांची नावे आहेत.
बुधवारी रात्री पती पत्नीने दोघा मुलासह आत्महत्या केली. वडिलांनी काढलेले कर्ज आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी जीवन संपविल्याचे समजते. आर्थिक अडचणीमुळे संपूर्ण कुटूंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संपूर्ण घटनेचा तपास पोलीस घेत आहेत. घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली असुन पुढील तपास सुरु आहे.
अधिक माहिती : सुतार कुटुंबीयांना आर्थिक व्यवहार, सुतारकाम, फर्निचर व्यवसायात अपयश कर्जबाजारी झाले होते. विविध कारणांसाठी काढलेल्या कर्जाला ते कंटाळले होते. त्यांनी 6 एकर शेती व 2 घरेही विकली होती. सध्या ते भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. बुधवारी रात्री 8 वाजता सुतार कुटुंबीयांनी शेजाऱ्यांना आपला एक मुलगा बेळगाव येथे रहायला आहे. तो आल्यानंतर त्यांना हा मोबाईल संच द्यावा असे सांगून आपण परगावी जाऊन येतो असे सांगितले होते. त्यानंतर रात्री सर्वांनी रायबाग रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या रेल्वे रुळावर येऊन रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. गोव्याहून दिल्लीकडे निघालेल्या निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेखाली कर्जाला कंटाळून चौघांनी आपले जीवन संपविले. रेल्वेच्या चालकाने वारंवार हार्न करून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर चौघांच्या आयुष्याचे होत्याचे नव्हते झाले. आत्महत्या केलेल्या सत्यापा सुतार यांच्या खिशामध्ये सुसाईट नोट सापडली असून रेल्वे पोलिसांनी ती जप्त करून पुढील तपास सुरू ठेवला आहे.