बेळगाव : विवाह झाल्यानंतर कुलदेवाचे दर्शन घेवून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. मात्र बेळगावच्या दोन नवदांम्पत्य शिवभक्तांनी स्वराज्याची राजधानी रायगडची मोहीम पूर्ण करून वैवाहिक जीवनाचा प्रारंभ केला. सौ. माधुरी आणि श्री. सागर गुरुनाथ चौगुले (रा. गणेश नगर, सांबरा) आणि सौ. हर्षदा आणि श्री. अभिषेक कृष्णा बुद्रुक (रा. बाबले गल्ली, अनगोळ) अशी या शिवभक्त नवदांम्पत्याची नावे आहेत. चौघेही सॉफ्टवेअर अभियंते आहेत. सागर आणि माधुरी पुणे तर हर्षदा आणि अभिषेक बंगळूर येथे नोकरी करतात.
YouTube Video
काही दिवसांपूर्वीच यांचे विवाह झाले. सागर आणि अभिषेक यांनी लग्नानंतर रायगड मोहीम करण्याची योजना आखली होती. माधुरी आणि हर्षदा यांनाही ही संकल्पना आवडल्याने त्यांनीही संमती दिली. बेळगावहून निघालेल्या या शिवभक्तांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांनी राजमाता जिजामाताच्या समाधीचे दर्शन घेवून रायगडाकडे प्रस्थान केले. अनवाणी आणि मराठमोळ्या वेषात गडाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होवून त्यांनी पहाटे 5 वा पुढील चढाईला सुरुवात केली. महादरवाजातून चढाई करत पहिल्यांदा त्यांनी राजसभा गाठली. मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला प्रेरणामंत्र म्हणून अभिवादन केले. त्यानंतर होळीच्या माळावरील मूर्तीचे दर्शन घेतले. राणीमहाल, बाजारपेठ, टकमक टोक आदी स्थळांची पाहणी केली. श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेवून छ. शिवरायांच्या समाधी स्थळ ला वंदन केले. ध्येय मंत्राने मोहिमेची सांगता केली. पारंपरिक वेशभूषा आणि शिवरायांची महती सांगणारी स्फुर्ती गीते गात जाणाऱ्या नवदांम्पत्यच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. अभिषेकने यापूर्वी केलेल्या गडकोट मोहिमांचाही त्यांना लाभ झाला.