बेळगाव : मागील रविवारी झालेल्या जनसेवक मेळाव्यास अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे बेळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे, असे मत भाजपचे राज्याध्यक्ष खासदार नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केले. पक्ष कार्यकर्त्यांची अवलोकन सभा शनिवारी बेळगावातील खासगी हॉटेलमध्ये झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जनसेवक मेळाव्यास एक लाखाहून अधिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती दर्शवून मेळावा यशस्वी केला, असे कटील यांनी यावेळी सांगितले. जनसेवक मेळाव्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे कटील यांनी सांगितले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे मेळावा यशस्वी झाल्याचे सांगितले.
खासदार इराण्णा कडाडी यांनीही मार्गदर्शन केले. ग्रामस्वराज मेळाव्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पुरस्कृत उमेदवार मोठ्या संख्येने निवडूण येणे शक्य झाल्याचे म्हटले. विधान परिषदेचे सत्ताधारी पक्षाचे प्रतोद महांतेश कवटगीमठ, चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार संजय पाटील, आमदार महेश कुमठळ्ळी, आमदार महादेवाप्पा यादवाड, पक्षाचे मुख्य सचिव महेश टेंगिनकाई, बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, बुडा अध्यक्ष होसमनी आदींसह अन्य उपस्थित होते.