बेळगाव शहरासह जिल्ह्यात धार्मिक स्थळांमधील चोर्यांच्या घटनांत वाढ,मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवरजिल्ह्यात अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोर्यांच्या घटनांनी मंदिरांची सुरक्षितता ऐरणीवर आणली आहे. अनेक मंदिरांमधून रोख रुपये, देव-देवतांचे साहित्य चोरीला गेले असल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांतील मंदिरात चोरीच्या घटना घडत आहेत. कलखांब (ता. बेळगाव) येथील ब्रह्मलिंग मंदिरात चोरी झाल्याची घटना शनिवारी (ता. 24 ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी देवाचा 1 किलो चांदीचा मुखवटा पळविला असून घटनेची नोंद मारिहाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी मंदिराचे पुजारी मारुती रेवणसिध्दाप्पा पुजारी (रा . कणबर्गी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दसऱ्यानिमित्त कलखांब येथील श्री ब्रह्मलिंग मंदिरात दररोज पूजाअर्चा करण्यात येत आहे. त्यानिमित्त देवाला 20,000 रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा बसविला होता. शुक्रवारी रात्री मंदिराचे पुजारी दरवाजा बंद करुन मंदिरात झोपी गेले होते. पुजारी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करुन गाभाऱ्यातील देवाचा चांदीचा मुखवटा पळविला. सकाळी हा प्रकार पुजाऱ्याच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थांना दिली. घटनेची माहिती समजताच मारिहाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत परिसरात खळबळ माजली असून चोरट्यांचा माग काढून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे.
अलिकडच्या काळातील धार्मिक स्थळांमधील चोरीच्या घटना अशा आहेत.
मोदगा गावातील दोन मंदिर
येळ्ळूर येथील दोन मंदिरे
मुचंडी गावातील मंदिर
मंडोळी येथील मंदिर
कलखांब येथील महालक्ष्मी मंदिर
त्यामुळेच भविष्यकाळात मंदिर विश्वस्त संस्था व नोंदणी न झालेल्या मंदिरांच्या व्यवस्थापन संस्थांनी मंदिराच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कलखांब येथे यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मात्र याकडे कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
सध्या शहर आणि उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे तर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान ठेवले आहे. घरफोड्या चोऱ्या याचबरोबर दरोडे सारखे प्रकार घडत आहेत. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. मंदिरातील जमा होणारी देणगी, दानपेट्या, देवतांचे दागदागिने, सोन्या चांदीच्या वस्तू यावर डोळा ठेवून चोरट्यांनी गेल्या काही काळात काही छोट्या-मोठ्या मंदिरातही डल्ला मारला आहे. त्यातील काही चोर्या उघड झाल्या असल्या तरी पोलिस खाते व धर्मादाय आयुक्त यांच्या सूचनांनंतरही संबंधित मंदिर व्यवस्थापनांनी चोरी होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नसल्याचेच मंदिरातील चोरी प्रकरणातून अधोरेखित झाले असून, त्यामुळे मंदिरातील देव असुरक्षित झाले असल्याचे दिसून येते.