बेळगाव—belgavkar—belgaum : मालगाव (ता. मिरज, सांगली) येथे किरकोळ कारणातून बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या गावातील वारकऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूकर (वय 52), परशुराम जाधव (45) आणि ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर (50) हे तिघे गंभीर जखमी झाले. पैकी परशुराम जाधव बेशुद्ध असून, त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगावातील तुरमुरी गावातील सुमारे 35 वारकरी पंढरपूरला आषाढी वारीसाठी गेले होते. वारी करून हे वारकरी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून मिरजमार्गे बेळगावकडे निघाले होते. परंतु महामार्गावरून मिरजकडे येत असताना या वारकऱ्यांचा रस्ता चुकल्याने ते मिरज तालुक्यातील मालगाव या गावात गेले. मालगावातील एका अरुंद रस्त्यावरून वारकऱ्यांचा ट्रक (केए 22 डी 8535) निघाला होता. त्यावेळी गावातील एका कारचालकाचा वारकऱ्यांच्या ट्रकचालकाशी वाद झाला. त्यानंतर ट्रकचालक श्रीकांत मनमाडकर ट्रक घेऊन मिरजेच्या दिशेने येऊ लागले.
यावेळी मालगावमधील एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या सुमारे 50 साथीदारांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक मालगाव ते मिरज रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे अडविला आणि कुऱ्हाडीचा दांडा आणि ट्रकवर लावलेल्या झेंड्याच्या काठीने वारकऱ्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाधव हे गंभीर जखमी असून ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर भयभीत झालेले वारकरी तक्रार देण्यासाठी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आले होते.