ओडिशाच्या ट्रेन अपघाताने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तीन ट्रेनना झालेल्या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतू यापैकी 40 जणांना साधे खरचटलेले सुद्धा नाहीय. या लोकांचे मृतदेह पाहून तपास अधिकारी हैराण झाले आहेत. एवढा मोठा अपघात झाला तरी या प्रवाशांच्या शरीरावर साधे ओरखडे देखील नसल्याने त्यांच्या मृत्यूचा कारण शोधले जात आहे. या 40 प्रवाशांचा मृत्यू विद्युतभारीत ओव्हरहेड वायर त्यांच्या बोगीवर कोसळल्यामुळे झाला असावा असा अंदाज लावला आहे. यादृष्टीने तपास सुरु केला आहे. जीआरपी सब इन्स्पेक्टर पापू कुमार नाईक यांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये याची नोंद आहे. अनेक मृतदेह ओळखता येणार नाहीत अशा अवस्थेत होते. तर 40 मृतदेह असे होते ज्यांच्यावर एकही जखमेचे किंवा रक्तस्त्राव झाल्याने निशान नव्हते. टक्कर आणि ओव्हरहेड एलटी (लो टेंशन) लाईनच्या संपर्कात आल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.
यशवंतपूर (बेंगळुरू) - हावडा एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 6.55 वाजता रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या बोगीला धडकली आणि तारा तुटल्या होत्या. रेल्वेच्या एका माजी अधिकाऱ्याने देखील हे शक्य असल्याचे म्हटले आहे. पूर्णचंद्र मिश्रा म्हणाले की, रेल्वेच्या वरच्या भागाला स्पर्श झाल्यानंतर या तारा बोगीतील आतल्या भागाला चिकटल्या असाव्यात, यामुळे विजेचा धक्का लागून बोगीतील सुस्थितीत असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला.