बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर म. ए. समितीने कार्यालय स्थापन केले. त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचा फलक बसविण्यासाठी रितसर परवानगी घेतली. त्यानंतर फलक बसविला. मात्र बेकायदेशीररित्या पोलिसी बळाचा वापर करत खानापूर येथील तो फलक हटविण्यात आला. त्यामुळे खानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग तसेच बेळगावचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार पाठविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुका सुरू असून या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापली कार्यालये स्थापन केली आहेत. त्या ठिकाणी पक्षाच्या नावाचे फलक लावले आहेत. त्याचप्रकारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने फलक लावण्यात आला होता.
कार्यालयाचा शुभारंभ करताना रितसर परवानगी घेण्यात आली होती. याचबरोबर फलक लावण्यासाठीही परवानगी घेण्यात आली होती. असे असताना बेकायदेशीररित्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फलक हटविला आहे. पोलीस बळाचा वापर करत हा प्रकार केला आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घटनाबाह्य असून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. बुधवारी खानापूर म. ए. समितीचे शिष्टमंडळ बेळगावात दाखल झाले होते. त्यामध्ये गोपाळ देसाई, यशवंत बिर्जे, माजी आमदार दिगंबर पाटील, नारायण कापोलकर, गोपाळ पाटील, सीताराम बेडरे, पांडुरंग सावंत, निरंजन सरदेसाई यांचा समावेश असून त्यांनी ही तक्रार केली आहे.