बेळगाव : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गड व किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी गडसंवर्धन समिती स्थापन केली आहे. या समितीत कडोलीतील (ता. बेळगाव) पंडित अतिवाडकर व दड्डीतील (ता. हुक्केरी) दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री असतील. गेल्या अनेक वर्षांपासून गड संवर्धनासाठी काम करणारे कार्यकर्ते व इतिहास संशोधकांची या समितीसाठी निवड करण्यात आली आहे.
ही समिती गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना करेल. त्याप्रमाणे सरकार पुढील निर्णय घेणार आहे. श्री. अतिवाडकर गेल्या अनेक वर्षांपासून विविध गड, किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत. तर श्री. हसुरकर सीमाभागातील गड, किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहेत.