Karnataka-Maharashtra Border Row : पाणीप्रश्नावरून सांगलीतील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकताच केला आहे. यामुळे सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. सत्ताधारी व विरोधक बोम्मईंवर तुटून पडले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी काल कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलेच सुनावलं आहे. त्यानंतर आज (शुक्रवारी) कोल्हापुरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा निषेध करीत ठाकरे गटाने आज दुपारी कोल्हापुरात आंदोलन केले. यावेळी कर्नाटकला जाणाऱ्या बस गाड्या रोखण्यात आल्या. बसस्थानकातील बसला काळे फासले, बसवर 'जय महाराष्ट्र'असे लिहिण्यात आले.
40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी काल (गुरुवारी) सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितला आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरून ट्वीट करत त्यांनी हा दावा केलाय. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर, आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे' असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मराठी गावे कर्नाटकात जाऊ देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तर विरोधकांनीही या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारवर टीकेची संधी साधून घेतली. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर टीका केली. राऊत म्हणाले, 'हे सरकार कमजोर, दुबळं सरकार आहे. कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रांच्या वर्मावर घाव घातला होता. शिंदे सरकारला लाज वाटली पाहिजे. '40 गावे कर्नाटकात जाणार नाही, असं नुसतं म्हणून चालणार नाही,' त्यावर ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. सरकार गुडद्यावर बसलं आहे. स्वाभीमानी 40 आमदारांचा स्वाभीमान कुठे गेला. त्यांनी कुठे शेण खाल्लं,'