कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला नव्याने सुरुवात झाली. कर्नाटक सीमाप्रश्नावरून सुरु असलेल्या याच वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे, महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर होत असलेल्या टीकेला शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटक सीमाप्रश्नावरून तुरुंगात जाऊन आल्याचा प्रसंग सांगत महाराष्ट्रातील एकही जागा कर्नाटकात जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकचा असल्याचा दावा केल्यानंतर जिल्ह्यातून संताप व्यक्त होत आहे. कर्नाटकातील 885 मराठी बहुभाषिक गावे अगोदर महाराष्ट्राला द्या, मग कन्नड गावांचे बोला, असा इशारा सीमा लढ्यातील कार्यकर्त्यांनी दिला असून जत तालुक्यातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी बोम्मई यांच्या दाव्यास तीव्र विरोध दर्शविला. जत तालुक्यातील 65 गावांनी 2012 मध्ये पाणीप्रश्नावर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त करीत कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता. तोच दाखला देत बोम्मई यांनी ही गावे कर्नाटकात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य मंगळवारी केले. त्यावरून महाराष्ट्रात व विशेषत: सांगली जिल्ह्यात वाद पेटला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक झाले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर आता दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींनी काही वर्षापूर्वी केलेल्या ठरावाचा दाखला देत बोम्मई यांनी या गावांना कर्नाटक सामील करुन घेणार असल्याचे म्हटले आहे. या ठरावांचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे असं बोम्मई यांनी म्हटले आहे. मात्र राज्य सरकाराने महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) आणि अक्कलकोट (Akkalkot) प्रदेश कर्नाटकचे असल्याचे सांगितले.