बेळगाव : नागरीकरणाच्या रेट्यात आणि वाढत्या प्रदूषणामुळे शहरातले तलाव नामशेष होतील की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, Pyaas Foundation ने तलावांच्या संवर्धनासाठी आपली तिजोरी खुली केली आणि या तलावाचे रुपडे पालटले. पाणी संवर्धनाच्या कामाला वाहून घेतलेल्या शहरातील प्यास फाउंडेशनने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन मागील महिन्यात मण्णीकेरी (ता. बेळगाव) येथील तलावाचे खुदाईद्वारे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले होते.
प्यास फाऊंडेशनने हाती घेतलेल्या त्या मण्णीकेरी तलाव प्रकल्पाला यश आले असून जिवंत झरे लागल्यामुळे हा तलाव पाण्याने भरला आहे. सदर तलाव खुदाईप्रसंगी जमिनीतून अचानक उडालेल्या स्वच्छ ताज्या पाण्याच्या फवाऱ्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. सध्याच्या ऐन उन्हाळ्यात या पद्धतीने तलावामध्ये दोन जिवंत झरे लागल्यामुळे अवघ्या तासाभरात मण्णीकेरी तलाव पाण्याने तुडुंब भरला आहे. आपल्या प्रयत्नांना भूमातेने अशा पद्धतीने आशीर्वाद देऊन यश मिळवून दिल्यामुळे प्यास फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
लोकसहभाग महत्वाचा : तलावांचा शास्त्रोक्त अभ्यास करून, वर्षभर तलावाच्या पाण्यातील प्रदूषणकारी घटकांची निरीक्षणे नोंदवून, सखोल रीसर्च करून तलाव संवर्धनासाठी ठोस उपाययोजना निश्चित करायला हव्यात. तलावातला गाळ आणि कचरा उपसणे, पाणी शुध्दीकरणासाठी जिवंत झरे मोकळे करणे, सभोवतालचे झिरपणारे सांडपाणी रोखणे, जैव साखळी सुरक्षित ठेवणे, पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न व्हायला हवेत. तलावात लोकांनी कचरा, निर्माल्य टाकू नये यासाठी जनजागृती मोहिमा राबवायला हव्यात. मुळात तलाव संवर्धन ही एकट्या सरकारची जबाबदारी नसून लोकसहभागातूनच हे संवर्धन अधिक प्रभावी पध्दतीने होऊ शकते. तलावांमध्ये कचरा, निर्माल्य आणि अन्य काही घाण न टाकण्याचा निर्धार बेळगावकरांनी करायला हवा. तलाव दत्तक योजनाही राबवता येईल. तलावाचे कायमस्वरूपी निरीक्षण करण्याची गरज आहे. पर्यावरण क्षेत्राशी संलग्न व्यक्तींनीसुध्दा तलावांकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे.- Pyaas Foundation