बेळगाव : उन्हाळा सुरू होताच प्राणी, पक्षी सैरभैर होतात. शेत-शिवारांत पाणी नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे धाव घेतात. शहरांत माणसांची गर्दी असते पण पशुपक्ष्यांसाठी चारा नि पाण्याची सोय नसते. नेमकी हीच उणीव भरून काढण्याचा प्रयत्न व्यक्ती व सामाजिक संघटना करत आहेत. अशा व्यक्ती, संस्थांनी चिमणपाखरांना आसरा देऊन माणुसकी जपली आहे. घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि आहाराची व्यवस्था येथील एका वकिलाने केली आहे. अॅड. मारुती कामाण्णाचे असे त्यांचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे, तर जलसाठ्यातील पाणी तळाला जाऊन पोचले आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्याअभावी त्रास होऊ नये यासाठी त्यांनी आपल्या घराजवळ पाणी, दाण्यांची व्यवस्था केली आहे. कामाण्णाचे यांच्या मालकीचे घर शाहूनगरातील साईनगर येथे असून त्यांच्या घराजवळ खुली जागा आहे. त्याठिकाणी त्यांनी फळे आणि फुलांची बाग फुलवली आहे. तेथे पक्ष्यांचा नियमित वावर असतो. मात्र पक्ष्यांसाठी या परिसरात पाणी मिळत नसल्याचे त्यांना जाणवले. शिवाय अलीकडे ऊन वाढले आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार मागील काही दिवसांपासून त्यांनी प्लास्टिक डब्यांचा उपयोग पाणी ठेवण्यासाठी करण्याचे ठरविले.
त्यानुसार प्लास्टिक कॅन निम्मे कापून ते फणसाच्या झाडांना अडकविले आहेत. शिवाय बागेत दाण्यांचीही व्यवस्था केली आहे. वाढता उन्हाळा व उष्णतेची तीव्रता पाहता, माणूस आपली तहान भागविण्यासाठी नानाविध समस्यांना सामोरे जाऊन प्रयत्नशील आहे; परंतु मुक्या पशु-पक्ष्यांचं काय? त्यांना आपली तहान भागविण्यासाठी मर्यादा पडत असून, सध्या वाढत्या उन्हाच्या झळा, त्यात ठिकठिकाणी आटलेले झरे, पाणवठे पाहता, या रखरखत्या उन्हात पशु-पक्ष्यांची एका थेंबाच्या पाण्यासाठी होणारी व्याकुळता ओळखून आपणही माणुसकी जपणं आवश्यक आहे.
अॅड. कामण्णाचे दररोज दोन वेळा पिण्याचे पाणी आणि आहाराची व्यवस्था पक्ष्यांसाठी करत आहेत. सकाळी दहाच्या सुमारास ते न्यायालयाला येतात. त्यापूर्वी पक्ष्यांसाठी पाणी, दाण्यांची व्यवस्था करतात. दिवसभर न्यायालयातील कामकाज पूर्ण झाल्यानंतर घरी येऊन पुन्हा पक्ष्यांसाठी पाणी, दाण्यांची व्यवस्था करतात. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन मॉर्निंग वॉकर्सनीही मदतीचा हात दिला आहे.