बेळगाव ता. खानापूर : खानापूरात बसमधील गर्दीमुळे दोन विद्यार्थिनी बेशुद्ध झाल्याच्या घटनेची दखल घेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खानापूर - लोंढा रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहे. तसे ट्विट आणि ईमेल त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना केले आहे. मंगळवारी बसमधील गर्दीत श्वास कोंडून लोंढ्यातील दोन विद्यार्थिनी अस्वस्थ झाल्याची घटना घडली होती. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोंढा मार्गावरील पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खानापूर - रामनगर महामार्गाच्या दूरवस्थेमुळे परिवहन मंडळाकडून सोडल्या जात नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. युवा समितीने यापूर्वीदेखील या मार्गावर कायमस्वरुपी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली होती. गेल्या तीन वर्षांपासून खानापूर रामनगर महामार्गाचे काम रखडले आहे. न्यायालयीन आदेशामुळे या मार्गाच्या कामाला सुरवात होण्याची शक्यता मावळली असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. विशेषत : विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.