बेळगाव : मराठी भाषकांविरोधात नेहमी गरळ ओकणाऱ्या कानडी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आता मराठी भाषक व्यापारी, दुकानदार व हॉटेलचालकांना त्रास देण्यास सुरवात केली आहे. एका कन्नड संघटनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी बुधवारी (24 फेब्रुवारी) शनिवार खुटावरील महिला आघाडी हॉटेल तसेच हिंडलगा गावामध्ये जाऊन कन्नड फलकासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत असून पोलिसांनी त्यांना वेळीच आवरावे अशी मागणी होत आहे. व्यवसायिकांना गुलाबाचे फुल देवून जरी कन्नड फलकासाठी विनंती केली असली तरी हा कोणताही अधिकार नसताना त्यांच्यावर एकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एका तथाकथित कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी महिला आघाडी हॉटेलमध्ये जाऊन फलक व माहिती मराठीत का लावली आहे, अशी विचारणा केली. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी हॉटेलच्या संचालिका कामानिमित्त बाहेरगावी गेल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. तरीही हे कार्यकर्ते ऐकत नव्हते. त्यामुळे, कर्मचाऱ्यांनी संचालिकेला फोन लावून याची माहिती दिली. त्यांनी या कार्यकर्त्यांशी बोलून कायद्याप्रमाणे तिन्ही भाषेत फलक लावल्याची माहिती दिली. तसेच महापालिकेचा नियम आधी समजून घ्या, असे सांगितले. तरीही काही वेळ कोल्हेकुई करुन ते कार्यकर्ते निघून गेले.
हिंडलग्यातील एका चहाच्या दुकानातही असाच प्रयत्न झाला. याअगोदरही कानडी फलकासाठी उद्यमबाग येथे व्यावसायिकांच्या मालमत्तेत घुसून धुडगूस घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना वेळीच आवरणे गरजचे बनले आहे. विविध नावाने काढण्यात आलेल्या संघटनांचे कार्यकर्ते पोलीस आणि महापालिकेच्या नावाने एकप्रकारचा धमकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, उच्च न्यायालयाने 2014 मध्ये निकाल देताना कोणत्याही व्यावसायिकाला कोणत्याही भाषेत व्यवसाय करण्यास अथवा फलक लावण्यास मुभा दिली आहे. तसेच संविधानातील कलम 19 च्या अंतर्गत त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणीही गदा आणू शकत नाही असे स्पष्ट केले आहे. मात्र, कायद्याची ओळख नसलेल्या त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी प्रशासनाच्या वरदहस्तामुळे वाढत आहे.
न्यायालयाचा निकाल दाखवावा : कोणत्याही प्रकारची भाषक दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर बंगळूर उच्च न्यायालयाचा निकाल दाखवावा. तसेच प्रशासनाने मराठी व्यापाऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या समाजकंटकाना वेळीच आवर घालावा. अन्यथा युवा समिती आणि मराठी भाषकांकडून त्यांना चांगलाच धडा शिकवला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.