कर्नाटकमध्ये एक भीषण घटना घडली आहे. चिक्काबळ्ळापूर जिल्ह्यात मंगळवारी (23 फेब्रुवारी) जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना झाली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना हा हिरेनागवेली गावात स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. टाटा एसचा चालक रियाज गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चिक्काबळ्ळापूर जिल्ह्यामध्ये स्फोटात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींनी जिलेटिनच्या कांड्यांचा बेकायदेशीरपणे साठा केला होता.
7 फेब्रुवारीला पोलिसांनी या उत्खलनाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या छापाच्या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच अचानक हा मोठा स्फोट झाला आहे. टाटा ऐसचा चालकाने याबाबत माहिती दिली आहे : रात्री 12 वाजता आम्ही गाडीतून जंगलात गेलो होतो. मध्यरात्री 12.45 वाजता स्फोट झाला. अवैध जिलेटिनच्या कांड्या पोलिसांच्या छाप्यात जप्त करण्यात येणार असल्याच्या भितीने जंगलात लपवून ठेवण्यात येणार होत्या. छुप्या पद्धतीने स्फोटकांना घेऊन जात असताना ही घटना घडली. टाटा ऐस चालक म्हणाला, मला माहित नाही टाटा ऐस गाडीमध्ये काय होते. ते बॉक्स आणि पिशव्या घेऊन जंगलात गेले. मी गाडीत बसलो असताना स्फोट झाला. स्फोटात ठार झालेल्या पाच जणांपैकी चार जणांची नावे संगणक ऑपरेटर रामू, गंगाधर, अभियंता उमाकांत आणि गावातील रामू अशी आहेत.
February 23, 2021
चिक्काबळ्ळापुरचे जिल्हा प्रभारी डॉ. के सुधाकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ही एक धक्कादायक घटना आहे. ही सर्व स्फोटकं बेकायदेशीरपणे साठा करून ठेवली होती. या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असं सुधाकर यांनी म्हटलं आहे. दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.