बेळगाव : ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने बांधण्यात येत असलेले व बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरू पाहणार्या किणये धरण प्रकल्पाला कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी भेट देऊन पाहणी केली. किणये गावानजीक असणाऱ्या खानापूरच्या मंगोत्री नदीच्या तीरावर हे धरण बांधण्यात येत आहे. या धरणामुळे परिसरातील खरीप हंगामात पिके घेणाऱ्या 1,200 हेक्टर सुपीक जमिनीसाठी तसेच रब्बी हंगामात 275 हेक्टर सुपीक जमिनीला या धरणातून सिंचन प्रस्तावित आहे.
ही योजना पूर्ण झाल्यास याचा लाभ शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे. खानापूर तालुका नजीक असल्याने यातील काही गावांनाही याचा फायदा होणार आहे. यामुळे हा प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. किणये धरणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी मंञी जारकीहोळी किणयेला आले होते. धरणाला दोन कालवे बांधले जाणार आहेत. कालव्यांचे बांधकाम तसेच भूसंपादनासाठी 78 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या धरणाचे कामकाज दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात धरण आणि संबंधित कामे आणि दुसऱ्या टप्प्यात कालव्यांचे कामकाज पूर्ण होणार आहे.
किणये धरणाच्या व्याप्तीत 10 कि. मी. लांबीचे दोन कालवे निर्माण करण्यात येत आहेत. उजवा कालवा 6 कि. मी. लांबीचा असून किणये, रणकुंडये, बहाद्दरवाडी, संतीबस्तवाड, वाधवडे गावाजवळून जातो. यामुळे या परिसरातील 2300 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. डावा कालवा 4 कि. मी. लांबीचा असून आजूबाजूच्या गावातील सुमारे 700 एकर जमिनीला पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती भेटीदरम्यान मंत्र्यांनी दिली. दोन्ही कालव्यांसाठी भूसंपादनची प्रक्रिया झाली पाहिजे, अशी सूचना मंत्र्यांनी केली. भूसंपादनासाठी अनुदानाचा कोणताही अडथळा नाही. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जिथे आवश्यक तेथे रस्ते करण्याची सूचनाही मंत्र्यांनी दिली.
किणये परिसर सह्याद्रीच्या व्याप्तीत येतो. जांबोटी परिसरापर्यंत पसरलेल्या घनदाट जंगलामुळे या भागात मुसळधार पाऊस होतो. मात्र या भागात कोणतेही मोठे धरण अथवा नदी नसल्याने पाणी वाया जाते. याचा फायदा शेतीला होत नाही. या परिसरात भात, रताळी, बटाटा, भुईमूग, ऊस आदी पिके घेण्यात येतात. पाण्याअभावी बागायती पिके घेणे अशक्य आहे. धरण पूर्ण झाल्यास या भागातील जमीन अधिक प्रमाणात ओलिताखाली येणार असून यातून शेतकर्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. कोसळणार्या पावसाचा सदुपयोग करण्यासाठी किणये परिसरात धरण उभारणीचे काम सुरू आहे. यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे सुमारे बारा वर्षापासून सुरू असणारे धरणाचे काम अर्धवटच आहे. या धरणाची संकल्पना 2003-04 च्या दरम्यान मांडण्यात आली. त्यानुसार या ठिकाणी सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्यात आला. प्रशासनाने आराखड्याला 2006 मध्ये मंजुरी दिली. त्यानंतर कामाला सुरवात झाली. अद्याप सदर कामकाज सुरूच आहे. 2003-04 मध्ये या प्रकल्पासाठी 9.31 कोटी अंदाजित खर्च होता. यानंतर यामध्ये वाढ झाली. यासाठी 79 कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी संपादित जागेची भरपाई मिळावी, अशी मागणी मंत्री जारकीहोळी यांच्याकडे केली.