बेळगाव : कर्नाटक सरकारच्या अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा साठा चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रीय महामार्ग-4 वरील कित्तूर येथे दोन ट्रक साठा पकडण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. NH4 वरील कित्तूर येथे असलेल्या गजराज पॅलेससमोर पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे : संतोष अशोक कामोजी (वय 21), महेश शरणय कुरवत्तीमठ (20) (दोघेही रा. कवलूरीन, जि. कोप्पळ), बुडानसाब अगसर (वय 24) (रा. करगाळ गाव, ता. सौंदत्ती, जि. बेळगाव) आणि सुलेमान अगसर (20, रा. निर्लापूर गाव, ता. नवलगुंद) अशी आहेत. हावेरी येथून महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या या बेकायदेशीर वाहतूकीला रोखण्यात पोलिसांनी यश आले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ऐवजाची एकूण किंमत 12 लाख रुपये इतकी होते.
प्रत्येकी 50 किलोचे एक याप्रमाणे एकूण 1,040 तांदूळ पोती ताब्यात घेण्यात आली. आरोपींचे 4 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कित्तूरचे सीपीआय मंजुनाथ कुसगल, पीएसआय देवराज उळागड्डी अधिक तपास करीत आहेत.