बेळगाव : भाजपचे सर्व आमदार मित्र आहेत. सर्व मंत्री एकत्र आहेत. आपल्यामध्ये कोणतेच मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिले. बंगळूर येथे उपसा जलसिंचन योजनेच्या विकासकामांचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी ते संवाद साधतला. खातेवाटप झाल्यानंतर नव्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे. भाजप नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याची चर्चा असल्याबाबत त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
जारकीहोळी म्हणाले, काही कारणांमुळे नाराज असणाऱ्या नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांसह प्रदेश भाजप नेतृत्वावर टीका करण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती वेगळी असून, मतभेद दूर करण्यात आले आहेत. खातेवाटपावरून काहीजणांना खात्यामध्ये बदल हवा आहे. त्यांच्या समस्या पक्ष पातळीवर दूर केल्या रमेश जारकीहोळी जातील. पक्षश्रेष्ठींनी काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्या सूचनांचे पालन केले जाईल. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. त्यामुळे प्रत्येकाने पक्षाची शिस्त पाळणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा सर्वांशी संवाद साधून ही समस्या दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खाते वाटपासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली नाही. वेळ आल्यास यावर चर्चा करू असे त्यांनी सांगितले. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आपण कटिबद्ध आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.