बेळगाव : चिकोडी - रायबाग रेल्वेमार्गाचे दुपरीकरण पूर्ण झाले आहे. त्यावरुन रेल्वे धावण्यासही सुरुवात झाली आहे. गतवर्षी घटप्रभा ते चिकोडी दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले आहे. त्याला आता Chikodi - Raibag रेल्वेमार्गाचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे घटप्रभा ते रायबाग या दरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, पुढील वर्षी रायबाग ते कुडचीपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण होईल.
मिरज - लोंढा रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम 2005-2006 मध्ये सुरु झाले. 186 किमी लांबीच्या योजनेसाठी 1,191 कोटी मंजूर झाले आहेत. त्यापैकी Ghataprabha - Chikodi दरम्यान 16 किमी रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये रायबाग - चिकोडी रेल्वेमार्गाचीही दुपदरीकरणाची भर पडली आहे. चिक्कोडी ते रायबाग 13.94 किमी अंतर आहे. दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी त्यावेळी या योजनेला चालना दिली होती. गेल्या महिन्यात रायबाग - चिकोडी दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी केली. त्यानंतर बुधवारपासून प्रत्यक्षात रेल्वे सुरु झाली.
यामुळे या रेल्वेमार्गावरून प्रवासी आणि मालवाहू रेल्वे धावणार आहे. तत्पूर्वी, रेल्वेचे मुख्य कार्यकारी अभियंता के. सी. स्वामी, रेल्वे अधिकारी टी. व्ही. भूषण, जी. शांतीराम यांनी या कामाची पाहणी केली. रायबाग रेल्वे स्थानकात इमारत दुरुस्ती, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षागृह, वातानुकूलित सभागृह, दोन प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलाची निर्मिती केली आहे.