बेळगाव : अन्न वाया घालविण्याचे प्रकार सध्या हॉटेलमध्ये अनेकवेळा घडतात. एकीकडे देशात अन्नाच्या अभावाने कुपोषणाने लहान मुलांचा नाहक बळी जात असताना आपण मात्र हॉटेलमध्ये जाऊन सर्रास अन्नाची नासाडी करतो. हे थांबविण्यासाठी मेक देम स्माईल फौंडेशनच्यावतीने अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. हॉटेलमध्ये ठेवण्यात येणाऱ्या टिशू पेपर बॉक्सवर अन्न वाचविण्याचा संदेश लिहिण्यात येत असल्यामुळे अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मागील वर्षी देखील फौंडेशनने असा उपक्रम राबविला होता. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे आता यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत शहरातील १० हॉटेलमधील टिशू बॉक्सला स्टिकर चिकटविण्यात येत आहेत. त्यावर अन्नाची नासाडी करू नये, जर अन्न शिल्लक राहिल्यास ते गरिबांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन त्यावर करण्यात आले आहे. यामुळे अन्नाची नासाडी न होता ते गरजूंपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.