बेळगाव : 'एक दिवा शिवरायांच्या चरणी' या संकल्पनेची कास धरून श्री किल्ले राजहंसगड येथे दीपोत्सव दिवे पेटवून करण्यात आला. बेळगाव शहर व परिसरातील सुमारे शेकडोहून अधिक मावळे दिवे घेऊन गडावर दाखल झाले होते. दिवाळीनिमीत्त श्री दुर्ग सेवा, बेळगावतर्फे रविवार रात्री 8 वाजता किल्ले राजहंस गडावर दीपोस्तव साजरा करण्यात आला. बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत प्रेरणामंत्र, नाम जयघोष करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघा राजहंसगड दुमदुमून निघाला होता.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य स्थापनेसाठी सह्याद्रीच्या डोंगररांगावर असलेले सर्व गड किल्ले आपला इतिहास आपली संस्कृती स्वाभिमानाने व अभिमानाने जिवंत दिसून येत आहे. आपण गड-किल्ल्यांची संख्या वाढवू शकत नसलो तरीही त्यांचे सौंदर्य संवर्धन वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.
आपल्या वाट्याला जितके गड-किल्ले आहेत ते पुढच्या पिढीला सुस्थितीत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे आवाहनही यावेळी जमलेल्या शिवभक्तांनी केले. यावेळी मावळ्यांनी दिलेल्या जय घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. तसेच दुर्ग संवर्धनाच्या अशाच काही मोहिमा भविष्यातही राबवणार असल्याचे दुर्गसेवकांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी दुर्गसेवा बेळगावचे अध्यक्ष श्री नरेंद्र बेळगावकर, बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, हिंदुराष्ट्र सेनेचे कर्नाटक अध्यक्ष श्री रविकुमार कोकितकर, बेळगाव युवा मोर्चाचे कपिल भोसले तसेच बेळगाव मधील शेकडो धारकरी तसेच श्री दुर्ग सेवा बेळगाव चे गडसेवक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन अध्यक्ष नरेंद्र बेळगांवकर यांनी केले.