बेळगाव : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रात्रीच्यावेळी होणाऱ्या चोर्या, घरफोड्या पोलिसांच्या डोकेदुखी ठरल्या आहेत. तपासाच्या नावाने जशी बोंब आहे, तशाच पद्धतीने पोलिसांच्या गस्तीचेही ‘तीनतेरा’ वाजले आहेत. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत चालले आहे. पुन्हा एकदा बेळगावात गुन्हेगारी आणि चोरट्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बेळगाव पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे (कायदा आणि सुव्यवस्था - डीसीपी - DCP) यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील पोलिसांच्या रात्रीच्या सर्व गस्ती पथकांसह अधिकाऱ्यांकडून दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत शहरात सर्व वाहने आणि व्यक्तींची तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
शहर परिसरात अलीकडच्या काळात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोर्या, घरफोड्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही. शहर व उपनगरांमध्ये महागड्या कार चोरीच्याही घटना घडल्या आहेत. त्यातच राञीस बेळगावात चालणारे जुगार-मटक्याचे खेळ, गँगवार, खून यामुळे शहर आणि उपनगर परिसरात आता दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पोलिसांची रात्रीची सर्व गस्ती पथके कार्यरत राहणार आहेत. यावेळेत रस्त्यावर वावरणाऱ्या वाहनांसह नागरिकांची चौकशी व तपासणी केली जाणार आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या या मोहिमेमध्ये रात्रीच्या गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकारी तसेच शक्ती आणि रक्षक ही पथके सहभागी असणार आहेत. याची समस्त बेळगावकर नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुचाकी चोरीच्या घटनांना आवर घाला.शहरासह जिल्ह्यात दररोज दुचाकी चोरींच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी चोरी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. यावर आवर कोण घालणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शल, मोबाईल पेट्रोलिंगसह पोलिस अशा वाहनांतून गस्त घातली जाते. मात्र, प्रभावी गस्त नसल्याने रहदारीच्या रस्त्यावरील दुकानेही फोडल्या जात असल्याचे चित्र आहे. गस्त घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने गस्तीवरील कर्मचारी मध्यरात्रीनंतर गस्तीला दांडी मारतात. शहरातील अनेक भागात कधीच गस्त घातली जात नसल्याचे दिसून येते. बऱ्याचवेळेस पोलिसांची वाहने फक्त मुख्य रस्त्याने फिरतात. छोटे रस्ते, अरुंद रस्त्यांवर कधीच पोलिसांचे वाहन जात नाहीत. त्यामुळे साहजिकच चोरट्यांना आयते रान होते.