बेळगाव : बेळगाव तालुक्यातील विविध भागांमध्ये पाणी अडविण्याच्या दृष्टिने आता मोठ्या प्रमाणात पाऊल उचलण्यात येत आहे. परिणामी अनेक तलावांची खोदाई करुन त्यामध्ये पाणी साठविण्याचे काम करण्याची धडपड सुरु आहे. त्यामुळे जलपातळीत वाढ होत असून याचा लाभ शेतकर्यांना व नागरिकांना होणार यात शंका नाही. आता हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या कार्यक्षेत्रातही 2 तलावांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एका तलावाचे काम पूर्णत्वाकडे आले असून दुसर्या तलावाचे खोदाई कामासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा जेलमधील कैद्यांबरोबरच इतरांनाही होणार आहे.
सध्या तालुक्यात 42 तलावांची निर्मिती करण्याचा ध्येय तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ठेवले आहे. त्या अनुषंगाने आता हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात दोन तलावांची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर अजूनही त्या ठिकाणी काही तलावांची निर्मित येत्याकाळात करुन त्याचा उपयोग नागरिकांना व जेलमधील कैद्यांना करुन देण्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यात पाणी जिरविण्यासाठी विविध तलावांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध ठिकाणी उद्योग खात्रीची जोड देत तलावांची निर्मिती करुन त्यामध्ये पाणीसाठा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने 'पाणी अडवा आणि पाणी जिरवा' ही योजना राबविली होती. मात्र याकडे अधिकारी आणि नागरिकांच्या असहकार्यामुळे ही योजना बारगळली होती. आता उद्योग खात्रीची जोड देत तलवांच्या खोदाईची कामे करण्यात येत आहेत. हिंडलग्यातील या तलावांतील पाणी प्रामुख्याने कारागृहातील जनावरे व इतर कामांसाठी होणार आहे. याचबरोबर परिसरातील शेतकर्यांनाही होणार असून जमिनीत अधिकतर पाणी झिरपावे या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे या तलावांचे काम पूर्ण होईल, असे तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी सांगितले.