बेळगाव स्मार्ट सिटी योजनेची अनेेक विकासकामे अपूर्ण राहिल्यामुळे बेळगाव शहरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी बेळगाव स्मार्ट सिटी योजनेने राज्यात सर्वाधिक निधी खर्च करून अव्वल क्रमांक पटकावला आहे. 66 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 7 स्मार्ट सिटीमध्ये बेळगावने पहिला क्रमांक पटकावला आहे. बेळगावसाठी सरकारकडून 396 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 290 कोटी 67 लाखांचा निधी विविध विकासकामांवर खर्च करण्यात आला आहे. 66 टक्के कामे पूर्ण झाली असून 36 टक्के कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती दिली आहे.
दावणगिरी 24 टक्के, हुबळी-धारवाड 13 टक्के, मंगळूर 10 टक्के, शिमोगा 16 टक्के, तुमकूर 28 टक्के आणि बंगळूर येथे केवळ 4 टक्के कामे सुरू केली आहेत. बंगळूर स्मार्ट सिटी योजनेने केवळ 40 कोटीच खर्च केले आहेत. सरकारकडून या 7 स्मार्ट सिटींसाठी 2340 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी केवळ 1154 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 310 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. आता केवळ 18 टक्केच कामे सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे. बेळगावात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे सुरू आहेत; पण सर्व कामे अपूर्ण असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आता बेळगावने राज्यात खर्च करण्यात पहिला क्रमांक पटकावला असला तरी, कामे वेळेत पूर्ण करून लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी लोकांतून होत आहे.