बेळगाव—belgavkar—belgaum : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी कपिलेश्वर उड्डाण पुलावर ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून जखमी झालेल्या दुसर्या व्यक्तीचाही सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोनवर पोचली आहे. विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय 56, रा. तेग्गीन गल्ली, वडगाव) असे सोमवारी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत 18 सप्टेंबर रोजी टॅ्रक्टरच्या ट्रॉलीखाली सापडल्याने सदानंद बी. चव्हाण-पाटील (वय 48, मूळचे रा. पाटील गल्ली, सध्या रा. सुळगा-येळ्ळूर) यांचा मृत्यू झाला होता, तर विजय हे जखमी झाले होते.
कपिलेश्वर उड्डाणपुलावर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मध्ये झालेल्या अपघातात सदानंद आणि विजय जखमी झाले होते. दोघांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र सदानंद यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर विजय यांच्यावर गेले 18 दिवस उपचार सुरू होते. त्यांना सुरुवातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या छातीला मुका मार लागला होता. जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर विजय यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्यांनी मिरवणुकीनंतर दुसर्या दिवशी जखमी विजय यांची भेट घेऊन आर्थिक मदत केली होती. विजय उपचारानंतर डिस्चार्ज घेऊन ते घरी गेले होते. मात्र, सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. विसर्जन मिरवणुकीत अपघात टाळण्यासाठी काटेकोर नियोजन गरजेचे आहे. पोलिस आणि मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाने प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शिस्तबद्ध मिरवणूक अनिवार्य केली पाहिजे, तरच असे अपघात टाळता येतील.