Indian cricket team departs from PM Modi's residence : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया मायदेशी दाखल झाली आहे. बार्बाडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरिल चक्रीवादळामुळे टीम इंडियाला भारतात पोहोचायला पाच दिवस लागले. आज पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टीम इंडिया दाखल झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं. टीम इंडिया तिथून ITC मौर्य हॉटेलमध्ये गेली. तिथेही टीम इंडियाच जोरदार स्वागत झालं. ITC मौर्य हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाली होती. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी टीम इंडियाच वर्ल्ड कप विजेत्या टीमच जोरदार स्वागत केलं.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मोदींनी टीम इंडियाच स्वागत करताना त्यांचं भरभरुन कौतुकही केलं. जवळपास दीड तास मोदींनी विश्व विजेत्या खेळाडूंशी चर्चा केली. टीम इंडियाचे सर्व खेळाडू मोदींना भेटण्यासाठी भारतीय संघाच्या गणवेशात पोहोचले होते. मोदींची भेट घेतल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईत आज टीम इंडियाची व्हिक्ट्री परेड आहे.
व्हिक्ट्री परेडचा मार्ग काय? : मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचा मार्ग आहे. संध्याकाळी 5.00 वाजता निघणाऱ्या या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलं आहे. जवळपास दोन तास ही व्हिक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही व्हिक्ट्री परेड काढण्यात येणार आहे.
टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शानदार विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवलं. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2007 साली टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर 2011 साली वनडे वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मेटमध्ये असा 13 वर्षांनी आणि T20 वर्ल्ड कप 17 वर्षांनी जिंकला.