Indian Railways Viral Video : गेल्या काही दिवसांपासून लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भातील तक्रारींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यात पुन्हा एकदा अशाच एका सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील फोटो व्हायरल होत आहे, ज्यातील एसी कोच पूर्णपणे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी भरलेला दिसत आहे. दिल्ली-सराय रोहिला सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लास एसी कोचमधील ही स्थिती आहे. एका युजरने हे फोटो पोस्ट करत लोक तिकीट न घेता फर्स्ट एसी कोचमध्ये कशाप्रकारे अतिक्रमण करून प्रवास करतात हे दाखवले आहे (Delhi Sarai Rohilla Train A1 Cabin).
‘कुशाल मेहरा’ नावाच्या ‘एक्स’ युजरने दिल्ली-सराय रोहिला सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कोचमधील हे फोटो पोस्ट करत या ट्रेनचा प्रवास अतिशय भयानक असल्याचे म्हटले आहे. त्याने या ट्रेनमधील विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत अनेक पोस्ट केल्यात. त्यातील पहिल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, “ट्रेन नंबर 22949 दिल्ली-सराय रोहिल्ला ट्रेन फर्स्ट एसीमध्ये विनातिकीट प्रवाशांचे प्रवास करणे सुरूच आहे. आत्ताच जेव्हा मी सीटवरून उठलो आणि वॉशरूमला जाण्यासाठी म्हणून निघालो, केबिनच्या बाहेर गेलो, पण त्याच्या पुढे मला जाता आले नाही. कारण महिला कंपार्टमेंटच्या मधोमध बसल्या होत्या. याबाबत मी अटेंडंटला विचारले, ज्यावर तो म्हणाला की, परिस्थिती अशीच आहे, कोणी काही करू शकत नाही.”
यानंतरच्या पोस्टमध्ये युजरने त्याचा पीएनआर नंबर, कोच आणि केबिन नंबर तपशील शेअर करत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत लिहिले की, “अशाप्रकारे मी ज्या केबिनमधून प्रवास करतोय तेथील बाथरुम गेली 5 तास बंद आहे पण कोणी कहीच केले नाही.” अशी तक्रार केली. Train no 22949 Delhi Saria Rohilla train first ac bathrooms shut for the last 5 hours. No one does anything @RailMinIndia यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एक पोस्ट केली, ज्यात त्याने सांगितले की, मी आधीची पोस्ट रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत हँडलला टॅग केल्यानंतर माझ्या केबिनबाहेर बसलेल्या लोकांना तिथून हटवण्यात आले. यावर त्याने “मी आयुष्यात कधीही ट्रेनने प्रवास करणार नाही”, असंही म्हटले आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर आता वेगाने व्हायरल होऊ लागली आहे आणि आतापर्यंत ती लाखो लोकांनी पाहिली आहे. या पोस्टने आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सरकार फक्त वंदे भारतवर लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळेच या जुन्या रेल्वे प्रवाशांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ‘ दुसऱ्याने लिहिले, ‘एक प्रवासी म्हणून मी मान्य करतो की, हे चुकीचे आहे. या वृद्ध महिला एसी केबिनजवळ का बसल्या होत्या? ‘अत्यंत उष्णता आणि इतर अतिपरिस्थितीमुळे लोकांना हे अशाप्रकारे बसून प्रवास करण्याची वेळ येत आहे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘आपल्याला अशा प्रकारची गर्दी आणि गोंधळाचा सामना करावा लागत असेल, तर फर्स्ट क्लासचे तिकीट खरेदी करण्यात काय अर्थ आहे?’