Farmer Protest 2024 : Delhi Chalo march : दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पंजाब-हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर बुधवारी (21 फेब्रुवारी 2024) सकाळी दिल्लीच्या दिशेने शेतकरी पुढे सरकू लागले आहेत. शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पुढे न जाण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आपल्या ट्विटर काऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. सरकार चौथ्यांदा चर्चा केल्यावर आता पाचव्यांदा देखील चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो. शांतता राखणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, असं अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. शेतकरी दिल्लीत प्रवेश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना रोखण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
Please click here to Watch this Video or photo on X (Twitter)
भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दिल्लीकडे कूच करण्याचा विचार करत आहेत. उद्या चंदीगडमध्ये संयुक्त किसान मोर्चाची (SKM) बैठक होणार आहे. ते भविष्यातील रणनीती ठरवतील. ही बैठक समोरासमोर होणार असून, त्यात देशभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत. एमएसपी हमी कायदा करावा. तसं न केल्यास संपूर्ण देशाचे नुकसान होईल. सरकार या विषयावर बोलत नाही.
शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शंभू आणि खनौरी बॉर्डरवर स्पेशल अलर्ट देण्यात आला आहे. आज जवळपास 14 हजार शेतकरी सोबत आणलेल्या 1200 ट्रॅक्टरसह दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. पंजाबच्या डीजीपींनी सर्व रेंजचे एडीजी, आयजीपी आणि डीआयजी यांना पत्र लिहून कुठल्याही परिस्थितीत जेसीबी, पोकलेन, टिपर, हायड्रा अशा अवजड वाहनांना हरियाणाच्या खनौरी आणि शंभू बॉर्डरच्या दिशेने पुढे येऊ देऊ नका, अशे आदेश दिले आहेत.