कोकणासह घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटातील वाहतूक 'इतके' दिवस राहणार बंदबेळगाव—belgavkar—belgaum : तिलारी घाट हा सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात आला आहे. जयकर पॉईंट येथे खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कामात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
तिलारी घाट 20 जून ते 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत एसटी व अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, एसटी वगळता इतर अवजड वाहनांची वाहतूक राजरोसपणे तिलारी घाटातून सुरू होती. दरम्यान, घाटातील जयकर पॉईंट येथे अतिवृष्टीमुळे रस्त्याचा काही भाग खचला. एसटी बंद झाल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल झाले. घाटातून एसटी पुन्हा सुरू व्हावी यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विविध आंदोलन, उपोषण केले. स्थानिकांचा प्रशासनाविरोधात वाढता उद्रेक पाहता एसटी पुन्हा सुरू करणे महत्त्वाचे बनले. त्यामुळे प्रशासनाने घाटातून एसटी उतरवून प्रात्यक्षिकही घेतले.
यावेळी खचलेल्या रस्त्याची सबब एसटी महामंडळाने पुढे केली. त्यामुळे चंदगड बांधकाम उपविभागाने खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यास मंजुरी प्राप्त करून घेतली. सोमवारपासून खचलेल्या रस्त्याची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने काम करत असताना तेथे कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे शक्य नसल्याचे सबब पुढे करत या घाटातील वाहतूक थांबविण्यात यावी, अशी मागणी चंदगड बांधकाम उपविभागाने येथील पोलिस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे हा घाट सर्वच वाहनांसाठी सोमवारपासून बंद झाला आहे.
हे आहेत पर्यायी मार्गघाट बंद झाल्याने दोडामार्ग-मांगेली-तळेवाडी ते चोर्ला मार्गे बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे. तसेच, दोडामार्ग-साखळी ते चोर्ला घाट मार्गे बेळगाव आणि तळकट-कुंभवडे-आंबोली मार्गेही बेळगाव व कोल्हापूरला जाता येणार आहे. मोर्ले ते पारगड हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नसला, तरी काहीजण या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे.