महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मंत्रिपद मिळाल्याचे पाटबंधारे मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर त्यांनी गोकाकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 6 फेब्रुवारीला मंत्रिपद मिळाले. त्यानंतर तत्काळ फडणवीस यांची भेट घेणे आवश्यक होते. पण , कोरोनामुळे त्यांची भेट घेणे जमले नव्हते. दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. ही भेट केवळ सहज होती. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
आपल्याला मंत्रिपद मिळवून देण्यात फडणवीस यांचे महत्त्वाचे योगदान असून दिल्लीतील भेटीत केवळ औपचारिक चर्चा रमेश जारकीहोळी केली. उमेश कत्ती आपले जवळचे मित्र आहेत. त्यांना मंत्रिपद मिळाले तर सर्वाधिक आनंद आपल्याला होईल. एमटीबी नागराज, एच. विश्वनाथ, सी. पी. योगेश्वर, आर. शंकर हे सर्वच आपले मित्र आहेत. त्या सर्वांना मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. पण, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि पक्षश्रेष्ठी घेतील, अशी माहिती मंत्री जारकीहोळी यांनी दिली.