किटवाड (ता. चंदगड) येथील धरणाच्या सांडव्यामुळे तयार झालेल्या धबधब्यात पडून चेन्नई येथील एकाचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्ती हा बेळगाव रेल्वे स्टेशन वरील कर्मचारी कार्तिक पल्यानी नंदेशा (वय 28) आयओडब्ल्यू (इन्स्पेक्टर ऑफ वर्क्स) आहे. बेळगाव रेल्वेतील आपल्या मित्रांसोबत तो पर्यटन स्थळवर आला होता. ही घटना आज (20 सप्टेंबर 2020) रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. मूळचा चेन्नई आणी सध्या बेळगावातील रेल्वे कॉटर्समध्ये राहत असलेला कार्तिक काही मित्रांसमवेत किटवाड येथे गेला होता. त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद किटवाडचे पोलीस पाटील ओमाना सुतार यांनी कोवाड पोलिसात दिली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
यासंदर्भात माहीती अशी - रविवार असल्याने बेळगाव रेल्वे क्वाटर्स येथील 7 ते 8 तरुण हा धबधबा पाहण्यासह स्नेहभोजन करण्यासाठी सकाळी 10 च्या सुमारास दाखल झाले होते. धबधब्यासह येथील परिसर पाहिल्यानंतर धबधब्याच्या काही अंतरावर त्या तरुणांनी भोजन बनविले होते. त्यातील कार्तिक हा जेवण केल्यानंतर धबधब्याकडे गेला होता. सायंकाळी 4 च्या सुमारास तब्बल तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे तो तरुण सांडव्याच्या पाण्यात पडून वाहून गेला. महाकाय धबधब्यात पडून मृत झाल्यानंतर त्याचा मृतदेह प्रवाहाबरोबर वाहत खाली गेला. सांडव्यामध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यातून त्या तरुणाला बाहेर येता आले नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पाऊस थाबल्यानंतर त्या तरुणांची शोधाशोध केली असता तो सांडव्याच्या पाण्यातून वाहून गेल्याचा संशय बळावला. सायंकाळी 6 च्या दरम्यान त्याचा मृतदेह सापडला. पण अंधार व काटेरी झुडपांमुळे तो सोमवारी सकाळी काढण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी ,मुलं ,आई, वडील असा परिवार आहे .सध्या कोरोनामुळे त्याचे सर्व कुटुंब तामिळनाडूतील चेन्नई येथे ते स्वगृही आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत किटवाडने धरण व धबधबा पर्यटकांना 8 सप्टेंबर पासून बंद केला आहे. तसे सूचना फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तथापि याकडे दुर्लक्ष करून बेळगावमधून आलेल्या पर्यटकांना हे पर्यटन महागात पडले. किटवाड गावालगत दोन लघू पाटबंधारे तलाव आहेत. त्यातील कालकुंद्रीकडील क्रमांक-2 च्या तलावातून सांडव्याद्वारे ओव्हरफ्लो होणार्या पाण्यामुळे धबधब्याची निर्मिती झाली आहे. या धबधब्यासह परिसरातील निसर्ग सौंदर्याची भूरळ चंदगड तालुक्यासह बेळगाव, सीमाभागाला पडली आहे. यातून येथे वर्षा पर्यटनासाठी गर्दी होत आहे. धबधब्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या पंधरा ते वीस वर्षात ही पहिलीच घटना घडली आहे.