बेळगाव ता. निपाणी : हिंदू संस्कृतीमध्ये संन्यासी,स्वामी संत यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगावर येणाऱ्या प्रत्येक संकटावेळी हेच साधुसंत लोकांच्या मदतीसाठी येत असतात. सध्या कोरोनाची महामारी जगभरात सुरू असताना समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी हे लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर आले होते. घरपोच भोजन, भाजीपाला वितरण, औषध वितरण या सगळ्या गोष्टींचे वाटप स्वामीजींनी केले आहे. यामुळे हिंदू संस्कृतीत असलेले महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सगळं जग स्वतःला कोंडून घेत असताना हे महास्वामीजी रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होते.
निपाणी येथील समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी कोरोना काळात लोकांची मदत केली आहे. संत महात्मे हे जनतेच्या कल्याणाचा विचार करत असतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात कार्यरत असताना लोकांच्या मदतीसाठी त्यांचे भक्तगण धावून आले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि समाधी मठाच्या माध्यमातून आतापर्यंत निपाणी शहर व परिसरात वीस हजार नागरिकांना मोफत रोग प्रतिकारक शक्ती औषधांचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात निपाणी-चिकोडी तालुक्यातील सर्व नागरिकांना मोफत औषधे देण्यात येणार आहे असे स्वामीजींनी सांगितले आहे. फक्त नागरिकांची मदतच नाही तर लोकांमध्ये कोरोनाची जागृती करण्याचे काम केले आहे. मठाच्या वतीने नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. प्रतिकारशक्ती वाढवणे, संतुलित आहार घेणे याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. औषधांची गरज ओळखून मोफत वाटप करण्यात आले आहे.
कोरोना काळात शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना भाजीपाला मिळणे मुश्कील झाले होते अशावेळी बाजारपेठ बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. या दोन्हीची सांगड घालत शेतकऱ्यांकडून भाजीपाला दान स्वरूपी स्वीकारून त्याचे मोफत वितरण घरोघरी करण्याचे काम स्वामीजींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. समाधी मठ येथे स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वसतिगृह चालवले जाते. निपाणी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना याचा होत आहे. संकटाच्या क्षणी महात्मे व त्यांचे मठ हे नागरिकांच्या मदतीसाठी येत असतात व त्यांच्या मुळेच मानवजातीवरील संकट व त्याची तीव्रता कमी होत असते. हे यामुळे समोर आले आहे.
Source : samantarkranti.in