बेळगाव : नुकतेच खानापूर शहरातील दोन तरुणांनी माजी केंद्रिय मंञी अनंतकुमार हेगडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. श्रीराम सेना हिंदूस्थानचे पंडित ओगले आणि शिवसेनेचे शिवा मयेकर यांच्या या प्रवेशाची सर्वञ चर्चा झाली. त्याबरोबर दोन दिवस का असेना खानापूर तालुक्यातले राजकीय वातावरण तापले. काहींनी या प्रवेशाला तितके गंभीरतेने घेतले नाही. काहींनी जास्तच मनावर घेतलं. मात्र पुढील काळात याचे परिणाम निश्चितच दिसून येतील यात शंका नाही. तालुक्यातील ही संघीय नांदी रोखण्यात विरोधकांना नाकीनऊ येतील.
पंडित ओगले कट्टर समिती कार्यकर्ते कै. प्रकाश ओगले यांचे चिरंजीव. पंडितने सात-आठ वर्षात श्रीराम सेनेचे सर्वेसर्वा प्रमोद मुतालिक आणि सध्याचे श्रीराम सेना हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाभरातील तरुणांना हिंदुत्ववादाकडे वळविण्याचा जो प्रयत्न केला तो काही अंशी यशस्वी ठरला. हाक मारावी आणि शंभर-दोनशे कार्यकर्ते एक दमात झेंड्यासह जमावेत, इतकी ताकद पंडितने निर्माण केली. बऱ्याचदा याचा राजकीय फायदा उठविण्यात आला. आरोप प्रत्यारोपाही झाले. जे तालुक्यातल्या कट्टर हिंदुत्ववादी भाजपवाल्या नेतृत्वाला जमलं नाही ते ते पंडितने केल. श्रीराम सेनेच्या संघटन काळात तालुका प्रशासनाला वारंवार निवेदनांचा झटका देणाऱ्या पंडित ला संघ-भाजपने आपल्या कामी हेरले आहे. तिकडे त्याचा वापर नक्कीच होणार. आक्रमक तरुणांना शाबासकी देणाऱ्या हेगडेंनी त्याला राखून ठेवत हिंदुत्वाच कडवं खुराक घालून अगदी बलदंड बनविल आहे. त्यात तालुका भाजपची चावी हेगडेंकडे असल्याने ते भविष्यात आपल्या या शिष्याला कोणाच्या डोक्यावर बसवतील याचा भरवसा नाही. त्यामुळे पक्षातले बेभरवशी भलतेच बिथरले आहेत.
शिवा मयेकर याला घरातला राजकीय वारसा. आई वडील दोघेही राजकारणात. त्यामुळे राजकीय प्रवेश काही नवा नाही. शिवा वडिलांबरोबर शिवसेना तसेच समितीच्या प्रत्तेक कार्यक्रमात सहभागी असायचा. राजकीय समज नसली तरी वारसा असल्याने शिवालाही राजकारणात भविष्य आहे. या तरुणांच्या राजकीय प्रवेशाचा भाजपला किती फायदा होईल काही सांगता येत नाही. मात्र याचा सर्वात जास्त तोटा सर्व विरोधी पक्षांना होणार यात शंका नाही. दोन्हीही तरुणांना समितीचे बॅकग्राउंड होते. येत्या काळात भाजपची प्रवेश प्रक्रिया जोर घेणार असल्याने राजकारण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंडित आणि शिवा यांच्या प्रवेशानंतर खानापूर भाजपात जे नवे चेहरे पुढे येतील ते अगदी जोराच्या पावसानंतर पीक उगवते तसे. मात्र यात पीक कमी आणि तण जास्त होईल यात शंका नाही.
माजी रामसैनिक गर्दी जमवून मतप्रदर्शन करण्यात माहिर असल्याने निष्क्रिय भाजप नेत्यांची उरलीसुरली पक्षातली इज्जतही संपुष्टात येणार हे निश्चित आहे. दोघांचाही राजकारणात चंचूप्रवेश झाला तरी त्यांना स्वतःला सिद्ध करण्यास कसरत करावी लागणार आहे. मात्र भविष्यात हे दोन चेहरे तालुक्याच्या राजकारणात खळबळ माजवतील हे मात्र नक्की.