जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरात मुलांना शाळेत न जाता घरूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे. भारतात अशी अनेक कुटुंब आहेत. ज्या ठिकाणी मुलांकडे डिजिटल माध्यामातून शिक्षण घेण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत. पण मोठ्या संख्येने पालक आपल्या मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी काही ना काही खटाटोप करून अभ्यासाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहेत. अशीच एक घटना बेळगाव शहरातून समोर आली आहे. ही घटना वाचून तुमचे डोळे नक्की पाणावतील. माहितीनुसार एका आईने आपल्या मुलांना डिजिटल माध्यामातून शिक्षण देता यावं यासाठी स्वत:ची सोन्याची कर्णफुले विकुन स्मार्टफोन खरेदी केला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात शाळा-कॉलेजही बंद आहेत. पण, ऑनलाईन क्लासद्वारे मुलांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, त्यामुळे गरीब कुटुंबातील पालकांच्या समस्येत आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सर्वांकडेच स्मार्ट फोन उपलब्ध नसल्याने अनेकांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास अडचण येत आहेत. या गोष्टीला फाटा देत, दहावीत शिकत असलेल्या आपल्या मुलीला ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी शहरातील सरोजनी बेविनकट्टी या महिलेने स्वत:ची सोन्याची कर्णफुले विकुन स्मार्टफोन खरेदी करीत तिच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला आहे. घरची परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अनेक पालक स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र गरीबीमुळे अनेकांना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी घरातील काही वस्तुंची विक्री करावी लागते. मुलीला स्मार्टफोन खरेदी करून देण्यासाठी सरोजनी बेविनकट्टी या क्लब रोडला कर्णफुले विक्रीस बसल्या होत्या. याबाबत अनेकानी त्यांच्याकडे विचारणा केली असता, मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी ही कर्णफुले विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
मुलीच्या शिक्षणासाठी सरोजनी यांनी घेतलेल्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. बेविनकट्टी या घरोघरी जाऊन जोगवा मागतात. त्यांच्या मुलाला रेल्वे अपघातात अपंगत्व आले असल्याने तो घरीच असतो. त्यांची मुलगी सरदार्स हायस्कुलमध्ये शिक्षण घेत आहे. मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी कर्णफुले विकून 10000 रुपयांचा मोबाईल विकत घेतला आहे.
सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्यांची परिस्थिती हालाखिची आहे. त्यांना घर सांभाळने कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुलीने वेळेत शिक्षण घ्यावे यासाठी बेविनकट्टी यांची सुरु असलेली धडपड सर्वांसाठी एक आदर्श ठरणार आहे.
ग्रामीण भागात जेमतेम 20 ते 27 टक्के स्मार्ट फोन, इंटरनेट इ. सुविधा उपलब्ध आहेत हे अधोरेखित झालेले आहे. परंतु साधा फोनवर निरोप मिळण्याचीही सोय नसताना ऑनलाईन क्लासेसचा विचार हे गुलबकावलीचे फूल ठरावे असे वास्तव आपल्याकडे अस्तित्वात आहे हे आधी स्वीकारावे लागेल. रेडिओदेखील उपलब्ध नसणारी दारिद्र्यरेषेखालची, रस्त्यावर राहणारी कुटुंबे आपल्या देशात आहेत आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देणे ही देखील शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनाची जबाबदारी आहे याचा बहुधा मानव संसाधन विकास मंत्रालयाला विसर पडला असावा.
ऑनलाईन शिक्षणासाठी या सामाजिक कार्यकर्त्याने दिला मदतीचा हात..याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व भाजपा नेते वीरेश किवडसन्नवर यांनी गरीब कुटुंबाची भेट घेऊन सोेन्याची कर्णफुले परत मिळवून दिली. किवडसन्नवर यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना कर्णफुले परत केली. तसेच आणखी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.