राज्य तसेच केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विविध सेवांमध्ये सूट दिली जाते. रेल्वे, बस प्रवासातदेखील ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकरची सूट दिली जाते. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे, बसनंतर थेट विमाानातून प्रवास करता येणार आहे. तोदेखील मोफत. विश्वास बसत नाहीये ना? मात्र ही बातमी तंतोतंत खरी आहे. याबाबतची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ विभागाच्या विकास यात्रेच्या शुभारंभप्रसंगी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही घोषणा केली आहे.
चौहान म्हणाले की, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना पुढील महिन्यापासून विमानाने तीर्थयात्रेला जाण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या तीर्थक्षेत्र योजनेत संत रविदासांच्या जन्मस्थानासह अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. या तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक सरकारी खर्चाने तीर्थक्षेत्री जाऊ शकणार आहेत.