IND vs BAN 2nd ODI : ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो ड्रेसिंग रुममध्ये परतला तो डाव्या बोटाला पट्टी बांधून... आता रोहित या सामन्यात काही खेळत नाही असे दिसत असल्याने विराट व शिखर ही जोडी सलामीला आली. पण, संघाची सातवी विकेट पडली अन् रोहितने मैदानावर फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या धाडसाचे साऱ्यांनीच कौतुक केले मोहम्मद सिराज, उम्रान मलिक व वॉशिंग्टन सुंदर यांनी बांगलादेशची अवस्था दयनीय केली होती. अनामुल हक (11), लिटन दास (7), नजमूल शांतो (21), शाकिब अल हसन (8), मुश्फीकर रहिम (12) व आफिफ होसैन (0) हे सहा फलंदाज अवघ्या 69 धावांवर माघारी परतले. दुसऱ्याच षटकात रोहित शर्माला स्लीपमध्ये झेल घेताना डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले.
मेहिदी हसन मिराज याने पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी वाढवली आणि यावेळेस त्याला महमुदुल्लाहच्या अनुभवाची साथ मिळाली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 148 धावा जोडल्या. महमुदुल्लाह 96 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 77 धावांवर तंबूत परतला. मेहिदी व नसून अहमद यांनी 22 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मेहिदीने 83 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. बांगलादेशने 7 बाद 271 धावा केल्या. रोहितच्या अनुपस्थितीत विराट कोहली व शिखर धवन ही जोडी सलामीला आली. विराटने चौकाराने खाते उघडले, परंतु इबादत होसैनच्या चेंडूवर पुल मारण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. विराट (5), धवन (8) व वॉशिंग्टन सुंदर (11) माघारी परतल्याने भारताची अवस्था 3 बाद 39 अशी झाली. लोकेश राहुल व श्रेयस अय्यर पुन्हा एकदा भारताचा डाव सावरतील असे वाटले होते, परंतु पहिल्या सामन्यात 73 धावांची खेळी करणारा लोकेश आज फेल गेला. मेहिदी हसनने त्याला 14 धावांवर LBW केले.
श्रेयसने वन डेतील 14वे अर्धशतक पूर्ण करताना सर्वात कमी 34 डावांत वन डेत 1500 धावा करण्याचा विक्रम नावावर केला. लोकेश राहुलने 36 डावांत 1500 धावा केल्या होत्या. यंदाच्या वर्षात भारताकडून वन डे त सर्वाधिक 686* धाव श्रेयसने केल्या आहेत. आज त्याने अक्षर पटेलसह पाचव्या विकेटसाठी शतकी धावा जोडल्या. श्रेयस- अक्षरची 107 धावांची भागीदारी मेहिदी हसनने तोडली. 102 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह 82 धाव करणाऱ्या श्रेयसचा आफिफ होसैनने अप्रतिम झेल टिपला. पुढील षटकात अक्षरने खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले.
बांगलादेशने गोलंदाजीत बदल केला आणि इबादत होसैनने भारताचा सेट फलंदाज अक्षरला ( 56) बाद केले. भारताचे 6 फलंदाज 189 धावांवर माघारी परतले होते आणि विजयासाठी त्यांना 11.4 षटकांत 83 धावा करायच्या होत्या. मांडीचे स्नायू ताणल्यामुळे 3 षटकं फेकून मैदानाबाहेर गेलेला दीपक चहर फलंदाजीला आला, सोबत शार्दूल ठाकूर होता. शार्दूल 7 धावांवर बाद झाला आणि भारताला विजयासाठी 42 चेंडूंत 64 धावा करायच्या होत्या. अशात रोहित मैदानावर आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बांगलादेशचे चाहते मात्र टेंशनमध्ये आले. बोट दुखत असूनही रोहितने 46व्या षटकात इबादतला 6, 6, 4 असे धुतले.