बेळगाव : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असताना हा वाद अधुनमधून राजकीय पटलावर येतो. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर आणि अक्कलकोट वर दावा केला. यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि अक्कलकोट भागात बोम्मई यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. तर, काही ठिकाणी कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहण्यात आलं. महाराष्ट्रातील भूभागावर केलेल्या दाव्यानंतर कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर महाराष्ट्राच्या काही भागात निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेळगाव शहरातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
महाराष्ट्र सरकारने प्रश्नाची सोडवणूक लवकर व्हावी यासाठी उच्चाधिकार कमिटीची बैठक मुंबईत झाल्यापासून कर्नाटकातील नेते बिथरले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावे कर्नाटकात येणार आहेत, असे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात आंदोलन केले जात आहे. शुक्रवारी कोल्हापूर येथे शिवसेनेने आंदोलन केल्यानंतर त्याचे पडसाद सीमाभागातही उमटू लागले आहेत. परिणामी, येथील वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसांनी बेळगाव शहरातील कॉलेज रोड येथील बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यालय व रामलिंगखिंड गल्लीतील शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यालय व शिवसेनेच्या कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. कन्नड संघटना पदाधिकारी गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनाने वातावरण बिघडू नये याची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वातावरण शांत होईपर्यंत समितीच्या कार्यालयासमोर बंदोबस्त असेल.