बेळगाव : बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याकडेला बसून सीताफळ विक्री करणार्या गरीब महिला व्यापार्यांना हटविण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार अरगन तलावानजीक घडला. पोलिसांच्या या भूमिकेबद्दल मात्र तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याकडेला बसून सीताफळ विकत असलेल्या गरीब लोकांमुळे अपघात होत असल्याचे कारण सांगून सदर व्यापार्यांना विरोध झाला.
यावेळी तेथून जात असलेल्या श्रीराम सेना व हिंदुराष्ट्र सेनेचे अध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी संतप्त भूमिका घेत पोलिसांना धारेवर धरत जाब विचारला. व त्या गरीब लोकांना न्याय मिळवून दिला. तसेच राबून खाणार्या गोरगरिबांना त्रास देऊ नका, असे आवाहन पोलिसांना केले. त्यामुळे पोलिसांनीदेखील नरमाईची भूमिका घेत व्यापार्यांवरील कारवाई थांबविली. यावेळी उपस्थित अजित झंगरुचे, अक्षय पाऊसकर, परशराम शहापूरकर व सचिन गरडे आदींनीही व्यापार्यांना सहकार्य केले.