बेळगाव : सासरच्या जाचास कंटाळून दोन दिवसापुर्वी सांबरा येथे एका 20 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली होती. मात्र, ‘आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तीची हत्या केल्याचा’ आरोप करत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे. पल्लव्वी राजशेखर पत्तार (वय 20, रा. सांबरा) असे मृत महिलेचे नाव आहे.
परंतु, तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मानसिक व शारीरिक त्रास करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
मृत महिलेचे वडील गंगाधर सातप्पा पत्तार (रा. अक्कमहादेवीनगर, इंडी, जि. विजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या मुलीचे वर्षापूर्वी राजशेखर याच्याशी लग्न झाले. काही महिन्यानंतर सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. तुला व्यवस्थित स्वयंपाक येत नाही, संस्कार नाहीत असे म्हणत मारबडव करणे, जेवण न देणे असा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून शुक्रवारी 29 मे रोजी दुपारी 12.45 च्या सुमारास पल्लवीला घरच्यांनी घरातील बेडरूममध्ये नेऊन फॅनला गळफास घालून तिचा खून केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. पल्लवीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये पती राजशेखर प्रकाश पत्तार, पतीची सावत्र आई सुमित्रा प्रकाश पत्तार, मोठा दीर राघवेंद्र प्रकाश पत्तार, सावत्र दीर प्रदीप प्रकाश पत्तार व नणंद पौर्णिमा प्रकाश पत्तार (सर्वजण रा. महादेवनगर, सांबरा) यांचा समावेश आहे. त्यानुसार मारीहाळ पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर अधिक तपास करीत आहेत.
नवविवाहितेचा खून करुन तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे भासविण्यात आल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली असून सध्या सर्व संशयित फरारी आहेत. एक वर्षांपूर्वी सांबरा येथील राजशेखर बरोबर पल्लवीचे लग्न झाले होते. शुक्रवारी 29 मे रोजी पल्लवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे माहेरी कळविण्यात आले. तिच्या माहेरवासीयांनी मात्र पल्लवीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याची फिर्याद दिली आहे. त्यामुळे पती, सासू, दीरासह पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व पाच जण फरारी आहेत .