बेळगाव : झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी तीर्थयात्रेला जाऊन परत आलेल्या कोरोना पाॅझिटिव्ह महिलेने जेवणावळ घातल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. अथणी तालुक्यातील 44 जण झारखंड राज्यातील धार्मिक स्थळाला भेट देऊन परत आले. त्यापैकी सवदी गावातील 7 जण, नंदगाव गावातील 3, बेळवक्की, झुंझवाड आणि हुक्केरी शहरातील प्रत्येकी 1 जण अशा एकूण 13 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मंगळवार 26 मे रोजी स्पष्ट झाले.
याञेवरून आल्यानंतर यातीलच 'त्या' महिलेने धार्मिक स्थळाला जाऊन परत आल्यानंतर प्रथेप्रमाणे जेवणाचे आयोजन केले होते. त्या जेवणावळीला नातेवाईकांसह अनेक जण उपस्थित होते. त्यामुळे अथणी तालुक्यातील खवटगोप गावासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांनाही आता क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. कोरोनाची बाधा झालेल्या व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून संग्रहित करण्यात येत आहे. पण किती जण संशयित हा पत्ता लागणे अवघड आहे.