बेळगाव : कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वेगाने वाढू लागल्याने खबरदारी म्हणून कर्नाटकने मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्रमधून रस्ते मागार्ने येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली आहे, तर स्पेशल विमान व श्रमिक रेल्वे ने येणाऱ्यांवर बंदी नाही. इतर राज्ये तसेच परदेशातून मोठ्या संख्येने लोक परतू लागल्याने कर्नाटकच्या कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यानंतर कर्नाटकाचे गृहमंञी यांनी तात्पुरता हा निर्णय घेतला आहे. 2781 कोरोनाबाधित सध्या कर्नाटकात आहेत. गेल्या 24 तासांत 248 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. यातील 200 महाराष्र्टातून आलेले आहेत.
राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई याबाबत म्हणाले की, पुढचे काही दिवस या महाराष्र्टातून एकही कोरोनाचा रूग्ण कर्नाटकमध्ये येऊ नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. राज्य प्रवेशासाठी ई-पासची तरतूद तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ई-पासशिवाय येणार्यांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येकाची तपासणी करण्यात यावी, असे आदेश गृहमंत्री यांनी दिले आहेत.
आज शनिवारी महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीवरील कोगनोळी चेकपोस्ट येथे गृहमंत्री बसवराज यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबत पाहणी केली. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी तेथील व्यवस्था आणि कार्याची सविस्तर माहिती घेतली आणि प्रशासनाने हाती घेतलेल्या कामाचे कौतुकही केले.
आंतरराज्य सीमा चेकपोस्टवरील अधिकार्यांनी कोणताही दबाव न घेता कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पोलिस आणि कोरोना योद्ध्यांनी आपल्या आरोग्यासाठी सतर्क राहावे असेही त्यांनी सांगितले. राज्य पोलिसांनी आपत्कालीन परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राज्यातील सर्व तबलीकी आणि त्यांचे नातेवाईक ओळखून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम यशस्वीरित्या हाताळले गेले आहे. राज्यात प्रवेश करणार्या वाहनांच्या ड्रायव्हर आणि क्लिनरच्या आरोग्याची तपासणीही करावी, असे निर्देशही दिले.
यावेळी आमदार महंतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी राघवेंद्र सुहास, बेळगाव पोलीस आयुक्त बी. एस. लोकेश कुमार, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.