केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. माहितीनुसार दोन्ही नेत्यांनी देशातील कोविड-19 स्थिती आणि यापुढे करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. केंद्र सरकार लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्याची शक्यता आहे. 25 मार्चला लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरु झाला होता. त्यानंतर आणखी तीन टप्पे वाढवण्यात आले. लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असून त्यानंतर पाचवा टप्पा जाहीर करून लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपणार आहे.
अमित शाह यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. या चर्चेमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर देशात कोविड रुग्ण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेप्रमाणे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमातून देशाला संदेश देतात. या रविवारी मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे.
देशभरात लॉकडाऊन-5 बाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यातच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढविण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, कोरोनाचा आलेख वाढत आहे, त्यामुळे आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन-5 मध्ये आणखी काही सूट देण्याची ही मागणी केली आहे. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे. 50 टक्के क्षमता आणि सामाजिक अंतरासह, रेस्टॉरंट सुरू केले पाहिजे आणि बरेच लोकं जिम सुरु करण्याची देशील मागणी करत आहेत.