केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लॉकडाऊन-4 च्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत काल (दि. 28 मे) बैठक घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी लॉकडाऊन-4 च्या राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. अमित शाह यांनी लॉकडाऊन वाढविण्याबाबत सर्व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. देशात 31 मे नंतर लॉकडाऊन वाढवलं तर त्याच्या गाईडलाईन्स काय असाव्यात, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, लॉकडाउन -4 चा कालावधी 31 मे रोजी संपणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता पुन्हा लॉकडाउन-5 देशात लागू होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, ठाणे, इंदौर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सुरत आणि कोलकाता या 11 शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये लॉकडाऊन शिथिलताची शक्यता कमी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा लॉकडाऊन-5 लागू केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशात लॉकडाऊन वाढविला जाणार की नाही, यावर स्पष्टीकरण देतील, असेही म्हटले जात आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्याप यश मिळालं नसल्याने लॉकडाउन पुढे वाढवायचा की नाही यासंबंधी लवकरच केंद्र सरकारने घोषणा करणं अपेक्षित आहे. पण त्याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लॉकडाउनसंबंधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी पहिल्या लॉकडाउनची घोषणी केली होती. 21 दिवसांसाठी हा लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. सुरुवातीला हा लॉकडाउन 3 मे आणि त्यानंतर 17 मे पर्यंत वाढवण्यात आला. चौथ्या टप्प्यात लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाउनचा चौथा टप्पाही 31 मे रोजी संपत असून त्यामध्ये वाढ करायची की नाही किंवा निर्बंध शिथील करायचे यासंबंधी केंद्र सरकार चर्चा करत आहे. याचाच भाग म्हणून अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांशी बोलताना अमित शाह यांनी राज्यांमध्ये चिंता वाटणारी ठिकाणे तसंच 1 जूनपासून सुरु केली जाऊ शकतात अशी कोणती क्षेत्रं आहेत यासंबंधी माहिती जाणून घेतली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी दरवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत अमित शाह नेहमी हजर असायचे. केंद्र सरकार पुढील तीन दिवसात लॉकडाउनसंबंधी निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.