कोगनोळी : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक राज्याने नियमांमध्ये शिथिलता त्यांच्या निर्णयानुसार दिली आहे. कर्नाटकने त्यांच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमधून येणाऱ्यांना बंदी घातली आहे. यामुळे ठाण्याहून आणलेल्या मृतदेहावर राज्याच्या सीमेवर महाराष्ट्रात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
बैलहोंगल (जि. बेळगाव) येथील लिंगराज बसवप्रभू बेळगावी (वय 53) यांचे मुंबईतील ठाणे येथे अपघाती निधन झाले. पण, कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या Lockdown टाळेबंदी व सीमाबंदी नियमामुळे त्यांच्या पार्थिवावर ना ठाण्यात, ना त्यांचे जन्म गाव असलेल्या बैलहोंगलमध्ये अग्निसंस्कार न करता निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील गायरानात पार्थिवावर अंत्यविधी करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबियांवर आली.
बैलहोंगलचे लिंगराज हे मुंबई येथे एल.अँड. टी (L&T) कंपनीत सेवा बजावत होते. 27 मे बुधवारी दुपारी 3 वाजता ठाण्यात त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मित्रांना ही माहिती कळताच त्यांनी सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून त्यांचा मृतदेह बैलहोंगलकडे पाठविला. मात्र, कोगनोळी तपासणी नाक्यावर सीमाबंदीमुळे त्यांच्या वाहनाला अटकाव करण्यात आला. बैलहोंगलला पार्थिव नेणे कठीण झाल्याने अखेर त्यांच्या कुटुंबियांनी कोगनोळी येथील गायरानात मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
याप्रसंगी पत्नी सुजाता, मुलगा, मुलगी, वडील बसवप्रभू, भाऊ शिवानंद, निपाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी उपस्थित होते. सीमाबंदीमुळे लाॅकडाऊन काळात आतापर्यंत चौघांच्या मृतदेहावर कोगनोळी तपासणी नाक्यांनजीक गायरानात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात वाढत असल्याने कर्नाटक सरकारने महाराष्ट्रासह गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व केरळ या राज्यातील जनतेला कर्नाटकात प्रवेशबंदी घातली आहे. कर्नाटकात लॉकडाउन शिथिल करताना या राज्यातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे कर्नाटकातील मृतदेहांवर सीमेवरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.