कर्नाटक राज्यात 'कोरोना' चा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण वाढत असताना शासनाने राज्यात शाळा सुरु करण्याचे नियोजन सुरु केले आहे. रुग्णसंख्या वाढत असताना शाळा सुरु करणे चुकीचे आहे. 'कोरोना' चा प्रादुर्भाव संपेपर्यंत शाळा सुरु करु नयेत. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सप्टेंबर नंतर सुरु कराव्या, अशी मागणी सिटीझन कौन्सिल बेळगाव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कर्नाटक राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात सिटीझन कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडूलकर तसेच शेवंतीलाल शहा, विजय आचमनी, एन.आर. लातूर यांनी सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थिती मध्ये शिरस्तेदार श्री मंजुनाथ यांचाकडे सुपूर्द केले.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात शाळा सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी याचा आढावा घेतला आहे. कोरोना रूग्णांचे वाढते प्रमाण पाहता शाळा सुरु करणे धोक्याचे होईल. विद्यार्थी शारिरीक अंतराचा नियम किती काटेकोर पाळतील याबाबत साशंकता आहे. एकीकडे परीक्षा रद्द करण्यात येतात, तर दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना घाईने शाळा सुरु करणे चुकीचे होणार आहे.
लॉकडाऊन - 3 नंतर जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी अद्याप कोरोनातुन जनतेची सुटका झालेली नाही. लवकरच पावसाळा येत असल्यामुळे आरोग्य विषयक सर्व काळजी घेत लहान मुलांना रिक्षा, शाळा बस किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीतून शाळेत पाठवताना सामाजिक अंतर पाळणे कठीण आहे. पावसाळ्यामध्ये आधीच मुलांना सर्दी आणि खोकला होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे 2020-21 चे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर नंतर सुरु करावे अशी मागणी केली आहे.