बेळगाव : पावसाचे पाणी शहराच्या वसाहतीमध्ये जाऊ नये, यासाठी दुरुस्तीची कामे मनपाने प्रस्तावित केली आहेत. याशिवाय सर्व नाला दुरुस्ती करण्यात येणार आहे. लेंडी नाल्यामुळेही हजारो एकर जमिनीतील पिके वाया जात आहेत. याचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे नाला खोदाई पावसाळ्यापूर्वी करा अन्यथा यावर्षीही शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तेव्हा याचा मनपाने गांभीर्याने विचार करुन नाला व्हिजन राबविण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
शहरलगत जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रामध्ये हा बळळारी लेंडी नाला असून, पावसाळ्यात शहरात संरक्षण भिंतीवरून गतवर्षी अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. मागील वर्षी मोठा पूर आला होता. तेव्हा नाले सफाई होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु मागील अनेक वर्षांमध्ये नाल्यामधील गाळ काढला नसल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी होऊ लागली आहे.
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळी पाणी वाहून नेणारे एकूण 40 नाले आहेत. या नाल्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. समर्थ नगर, कोनवाळ गल्ली, शास्त्री नगर येथे गतवर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी संघटनाने नाला व्हिजन राबविण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, किरण जाधव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनिल जाधव, किसन सुंठकर, अनिल चौधरी, महादेव चौगुले, महेश रेडेकर, सागर पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.