देशात सतत वाढत असलेल्या कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमणादरम्यान, कर्नाटक सरकार (Karnataka Govt) ऑगस्टपासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत. राज्यात शाळा हळूहळू सुरू होतील आणि पहिल्या टप्प्यात रेड झोन नसलेल्या भागात शाळा सुरू केल्या जातील. पण, शिक्षण ऑनलाईन पद्धतीने की विद्यार्थ्यांना वर्गात बसवून किंवा दोन्ही पद्धतीने द्यायचे, याबाबत निर्णय होणे बाकी आहे. शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी नुकतेच वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षणतज्ज्ञांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत आपल्याला पुढील आठवड्यात निर्णय जाहीर करावा लागणार आहे, असे स्पष्ट केले आहे.
शिक्षण खात्याने सद्य : स्थितीला तीन पर्यायांवर विचार चालवला आहे.
1. शाळा शारीरिक अंतर ठेवून सुरू करणे.
2. निर्धारित दिवशी गटवार वर्ग सुरू करणे आणि उर्वरितांना घरातून ऑनलाईन शिक्षण देणे.
3. ज्या शाळा सुरू होणार नाहीत, त्यांना पूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने शिकवणे.
सुरेशकुमार यांनी सांगितले की, आमच्यासमोर तीन पर्याय आहेत. त्यापैकी गटवार वर्ग सुरू करणे आणि त्याच दिवशी उर्वरितांना दूरदर्शनद्वारे शिक्षण देणे हा पर्याय योग्य वाटतो. सरकार सध्या केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या मार्गसूचीची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतरच राज्याचे शिक्षणविषयक धोरण स्पष्ट होणार आहे. काही शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक मतदार संघातील आमदारांनी शाळांबाबत ऑनलाईन शिक्षणपद्धतच सरस ठरणार आहे, असे मत मांडले आहे.
काही शाळांमध्ये शारीरिक अंतर राखून शिकवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे सरकारने कोरोनावर लस मिळत नाही, तोपर्यंत शैक्षणिक वर्ष लांबणीवर टाकावे आणि केवळ ऑनलाईन शिक्षणपद्धतीवर भर द्यावा, असे मत माजी शिक्षणमंत्री बसवराज होरट्टी यांनी व्यक्त केले आहे. त्यावर शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी ऑनलाईन शिक्षण हा सक्षम पर्याय ठरत नाही. 85 लाख विद्यार्थ्यांपैकी 40 ते 50 लाख विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्याठिकाणी इंटरनेट सुविधा मिळणे सोपे नाही. त्यामुळे गटवार वर्ग सुरू करणे सोयीस्कर ठरेल, असे सांगितले.
सरकारकडे असलेले आणखीन पर्यायविद्यार्थ्यांना सम विषम रोलनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये बोलवणे.
एका डेस्कवर फक्त एका विद्यार्थ्याला परवानगी.
दरम्यान, शाळा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर हानिकारक परिणाम होईल असं शिक्षणमंत्री यांनी सांगितलं. शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करत आहे. शिक्षणमंत्र्यांनी असं संकेत दिलं की 'शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेपूर्वी काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे'.
खरंतर, कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
देशात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. या संसर्गामुळे संपूर्ण देशात 3 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1.50 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाची नोंद झाली. यावेळी सर्व लोकांना सामाजिक अंतर राखण्यासाठी जोर देण्यात येत आहे. सध्या सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा शिथिल केला आहे.