बेळगाव ता. खानापूर : सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत आहे. (coronavirus) पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. खानापूर तालुक्यातील आंबेवाडी गावातील 45 जणांचा अहवाल आठवड्यानंतर पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे गावकरी धास्तावले आहे.
खानापूर तालुक्यातील विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असतानाच खानापूर तालुक्यातील आंबेवाडी गावातून ही माहिती समोर आली आहे. 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पॉझिटिव्ह आलेल्या गावकर्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तब्बल 8 दिवसांनी कोरोना अहवाल आल्यानंतर आरोग्य खात्याच्या या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आंबेवाडी गावातील शेकडो जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. 1 मे रोजी ही तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल 9 मे रोजी मिळाले आहेत, त्यापैकी 45 जणांना कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 8 दिवसांनी अहवाल मिळाल्यामुळे आणि त्यात 45 जण बाधित आल्यामुळे गावात खबरदारी घेण्यात आली आहे.