इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा शेवटचा सामना 30 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेनंतर भारतात ऑक्टोबर महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघासाठी आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ देखील सहभाग घेणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील वादामुळे पाकिस्तानी खेळाडूंना व्हिजा मिळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी माध्यमांना टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी व्हिजा देण्यात येईल.
शुक्रवारी बीसीसीआयच्या वर्चुअल बैठकीत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी आयसीसीच्या अनेक बैठकीत मागणी केली होती की, पाकिस्तान क्रिकेट संघासोबत माध्यमे आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना देखील विश्वचषक स्पर्धेसाठी व्हिजा देण्यात यावा. यानंतर बीसीसीआयने माध्यमांना व्हिजा देण्याची अनुमती दिली आहे. परंतु पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांबद्दल निर्णय घेतला गेला नाहीये. याबाबतचा निर्णय गृहमंत्रालयातर्फे घेण्यात येणार आहे.
या बैठकीत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत देखील चर्चा करण्यात आली. एका अहवालानुसार, ‘टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात 9 ठिकाणांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, धर्मशाला, चेन्नई, बेंगळुरु, लखनऊ आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. तर हैदराबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे. तसेच स्पर्धा जेव्हा जवळ येईल तेव्हा इतर निर्णय घेण्यात येणार आहेत. कारण ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात कोविड-19 ची परिस्थिती काय असेल? हे सांगणे कठीण आहे.’