नवी दिल्ली : आपण कोरोना संकटाच्या वेळी रेल्वेने प्रवास करत असाल तर सामाजिक अंतराचे पालन नक्की करा. तसेच मास्कही नेहमी वापरा. वारंवार सांगूनही लोक सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे अशा गोष्टींकड दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेने आज मोठी घोषणा केलीय. जर आता कोणी रेल्वेच्या आत किंवा स्टेशनच्या आवारात मास्क परिधान करत नसेल तर त्यांच्यावर 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
मास्क न घातल्याबद्दल दंड करण्याचे आदेश : रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मास्क न घातल्याबद्दल दंड करण्याचे आदेश पुढील सहा महिने लागू राहतील. अनेक राज्य सरकारांनीही मास्क न घालण्याबाबत असे आदेश जारी केलेत. उत्तर प्रदेश सरकारने एक फर्मान जारी केलाय की, पहिल्यांदा मास्कशिवाय पकडल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल, तर दुसऱ्यांदा दंड 10 हजार रुपये असेल.
पाटणा स्टेशन प्रशासनानेही घेतला निर्णय : यापूर्वी पाटणा रेल्वे प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांबाबत कठोर निर्णय घेतला होता. पाटणा स्टेशन आवारात जर कोणी मास्क न लावता आढळला तर त्याला 500 रुपये दंड भरावा लागेल (विना मास्कसाठी 500 दंड). लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात विशेष मास्क तपासणी मोहीम राबविली जात आहे.